Translate

Monday, January 30, 2017

शतावरीचे फायदे

शतावरी
शतावारीचा वेल भारतातील डोंगराळ प्रदेशात प्रामुख्याने आढळतो.
शतावारी ही एक झुडुप वजा वेली आहे. ही वनस्पती साधारण 1 ते 4 फूट उंच वाढते. हीची पाने अगदी बारीक असतात. तिच्यावर काटे असतात. शतावरीच्या मुळांचा व पानांचा उपयोग केला जातो. मंजिर्‍यांमध्ये फुले येतात व वाटण्यासारखी कठीण फळे येतात. शतावारीचे कंद पांढरे व लांब असतात. शतावारीचे वैज्ञानिक नाव अ‍ॅस्पारागस रासेमोसस वाईल्ड (Asparagus Racemosus Wild) असे आहे. संस्कृतमध्ये शतावारी, नारायणी,शतमूली इत्यादि नावे आहेत. इंग्रजीत अ‍ॅस्पारागस (Asparagus) तर हिंदीत शतावर म्हणतात.
रासायनिक गुणधर्म-:
शतावरीत मधुर , स्वादु , शीतल, बल व मेधावर्धक पौष्टिक तत्वे असतात.
उपयोग -:
1) उन्हाळीवर – ओल्या शतावरीच्या मुळया ठेचून त्याचा रस 10 ग्रॅम व तितकेच दूध घालून पिण्याने उन्हाळीचा त्रास कमी होतो.
2) शक्तिवर्धक – शरीरातील सात ही धातु पुष्ट होऊन वजन वाढण्यासाठी शतावरीचे चूर्ण रोज दुधातून घ्यावे.
3) शतावरी तेल – सर्व प्रकारच्या सांधेदुखी व वातविकारांवर हे तेल गुणकारी आहे. यालाच नारायण तेल म्हणतात. कारण संस्कृतमध्ये शतावरीचे एक नाव नारायणी पण आहे. वात विकारांत मज्जा व स्नायू यांना या तेलाने शक्ति मिळते हे सिद्ध झालेले आहे. शतावरी कल्प स्रियांप्रमाणे पुरूषांना देखील उपयुक्त आहे. शतावरी कल्प बाजारात उपलब्ध असते.
4) पित्तावर – शतावारीच्या रसात मध मिसळून चाटल्यास पित्त कमी होते.
 ओली व ताजी शतावरी 100 टक्के गुणकारी असते, सुकी शतावरी 50 टक्के तर 6 महीने जुनी 10 टक्के गुणकारी असते. म्हणून ताज्या मुळांचाच शक्यतोवर उपयोग करावा. धन्वंतरी , सुश्रुत , भावप्रकाश , चरकसंहिता इ. प्राचीन ग्रंथांमध्ये शतावरीचा उल्लेख आहे.                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                          


Wednesday, January 18, 2017

वेखंड एक औषधी वनस्पती

वेखंड


हे झाड लहान असते. सुगंधी असते आणि खुप फांद्याचे असते.
याचे खोड जमिनीत पसरते. याला हिरवट रंगाची लहान लहान फुले येतात. याला येणारी फळे पिवळसर रंगाची असतात.
हे झाड भारतात समुद्रसपाटीपासून 280 मीटर उंचीच्या ठिकाणी सापडते. दलदलीची ओलसर जागा या झाडाला मानवते. हिमालयाच्या आग्नेय भागात व कर्नाटकात हे झाड सापडते.
ह्या झाडाचे वाळलेले खोड (मूलस्तंभ) हे वेखंडाचे तेल पोट फुगणे, गॅसेस ह्यावर उपयुक्त आहे. वेखंडामुळे पचनशक्ती वाढते. वेखंडाचा उपयोग औषध म्हणून दम्यावर पण करतात.
वेखंडात टॅनिन हे औषधी द्रव्य असते. याची पाने सुगंधी पदार्थात, पेयात घालतात. वेखंड आपल्याला परकीय चलन
मिळवून देते. ह्याचे कुल आरेसीई- हिंदीत याला बचं असे म्हणतात. तेलगूत वसा असे म्हणतात तर संस्कृतमध्ये भूतनाशिनी असे म्हणतात. वेखंडाची पावडर सर्दीवर वापरतात. अगदी छोट्या बाळाला सर्दी झाली तर वेखंड उगाळून डोक्यावर लेप देतात. सर्दी पटकन कमी होते. प्राचीन काळापासून घराघरात या वनस्पतीला अत्यंत मोलाचे स्थान आहे. म्हणूनच वेखंडाची लागवड करणे खूपच फायदेशीर ठरते. शेतकर्‍यांनी  वेखंडाची लागवड नव्याने सुरुवात करायला काही हरकत नाही.


Tuesday, January 17, 2017

रिठा एक उपयुक्त वनस्पती

रिठा
    रिठा ही वनस्पती भारतात दोन उपयोगांसाठी लोकप्रिय आहे .


  • सोन्या-चांदीचे दागिने अलंकार धुण्यासाठी

  •     केस धुण्यासाठी.


रिठ्याच्या 2 जाती आहेत.
1)  हे वृक्ष हिमाचल क्षेत्रात 4000 फूट उंचीवर तसेच उत्तर भारतात
आसाम आदि प्रांतात बाग – बगिच्यांमध्ये किंवा गावाच्या आसपास बघायला मिळतात.
2)  हे वृक्ष विशेषत: दक्षिण भारतात आढळतात. याची फळे 3-3 ने एकत्र जुळलेली असतात.
      रिठयाचे वैज्ञानिक नाव सॅपीनडस ड्रायफोलियाट्स ( sapindus   Trifoliyatus) असून, संस्कृतमध्ये याला अरिष्टक,रक्तबीज,फेनिक असे म्हणतात. इंग्रजीत सोपनट ट्री (soapnut tree) असे नाव आहे. रिठयाचा वृक्ष 50 फूट पर्यंत वाढतो. याची पाने 5 ते 12 इंच लांब असतात. फुले पांढर्‍या रंगाची मंजिर्‍यांमध्ये येतात. फळे घोसांमध्ये लागतात, फळे सुकल्यावर सुरकुतलेली व काळपट लाल रंगाची असतात. याला फुले नोव्हेंबर –डिसेंबरमध्ये येतात व मार्च-एप्रिलमध्ये फळे तयार होतात.


·       रासायनिक गुणधर्म :-
रिठ्याच्या फक्त फळांचा उपयोग होतो. त्यात सैपोनिन, शर्करा, पेप्टिन असते. बियांमध्ये 30 टक्के चरबी असते, त्याचा साबण बनविण्यास उपयोग होतो.
·       उपयोग-:
1)  अर्धशिशीवर- रिठ्याला 1-2 काळ्या मिर्‍यांबरोबर पाण्यात घासून त्याचे 1-2 थेंब नाकात टाकल्याने उपाय होतो. मिर्‍याऐवजी लिंबाचा रस पण वापरता येतो.
2)  त्वचारोगावर- रिठा पाण्यात फेसून ते पाणी लावल्याने खरुज, गजकर्ण खाज इ. रोगांवर फायदा होतो.
3)  कफ पडण्यासाठी- रिठयाचे चूर्ण पाण्याबरोबर घ्यावे. कफ पातळ होतो व ओकारीवाटे बाहेर पडतो.
4)  उवा व लिखांवर- शिकेकाई 200 ग्रॅम, आवळा 100 ग्रॅम,रिठा 100 ग्रॅम, कापूर कचेरी 50 ग्रॅम, नागरमोथा 50 ग्रॅम,10 ग्रॅम कापूर एकत्र पावडर करावी. थोडी पावडर घेवून याचा लगदा डोक्याला लावावा व तासाभराने डोके गरम पाण्याने धुवावे. ही पावडर वर्षभरासाठी पण करून ठेवता येते.फक्त कापूर वेळेवर उवा असल्यास घालावा.
5)  सोन्याचांदीचे अलंकार धुण्यासाठी व भांडी स्वच्छ करण्यासाठी रिठा वापरण्याची चाल भारतात पूर्वीपासून आहे.
6)  विंचवाच्या विषावर- रिठ्याला पाण्यात वाटून तो लगदा विंचू चावला त्या जागी लावावा. विष उतरते.


Friday, December 16, 2016

कडुनिंब

कडुनिंब

शास्रात म्हटले आहे की रात्रीच्या वेळेस वृक्षांच्या खाली झोपणे हानीकारक असते,पण हा समज
कडुनिंबाच्या बाबत मात्र लागू पडत नाही.कारण बाकी वृक्ष रात्रीच्या वेळेस कार्बनडाय ऑक्साइड हा गॅस बाहेर टाकतो. पण केवळ कडुनिंब मात्र प्राणमय, आरोग्यवर्धक, रोगनाशक वायू बाहेर टाकतात. संस्कृतमध्ये  याला अरिष्ठ म्हणजे ज्याने शरीराला हानी होत नाही असे म्हणतात. 'निम्बाति,सिंचति स्वास्थ्य इति निम्बम ' असे म्हटले आहे. प्राचीन वैज्ञानिक ग्रंथामध्ये वसंत ऋतुतील कोवळी पाने विशेष करून सेवन करण्यास संगितले आहे. हा अत्यंत उपयुक्त वृक्ष केवळ भारतातच सर्व ठिकाणी आढळतो. म्हणूनच याला कल्पतरू असे म्हणतात. याच्या अलौकिक गुणांमुळे प्राचीन काळापासून या वृक्षास अत्यंत महत्त्वाचे असे स्थान दिले आहे. अनेक रोगांवर व अन्य कारणांसाठी संपूर्ण झाडाचा उपयोग केला जातो. हिंदु वर्षारंभी , गुढीपाडव्याच्या  दिवशी  कडुंनिंबाची कोवळी पाने, सैंधव मीठ,फुले, जिरे, गूळ, कैरी एकत्र करून प्रसाद म्हणून खाण्याची प्रथा भारतात ,
मुख्यत: महाराष्ट्रात आहे.  कडुंनिंबाचे वैज्ञानिक नाव आझाडायराक्टा इंडिका (Azadirachta indica ) असून,
संस्कृतमध्ये निम्ब, अरिष्ठ अशी नावे आहेत. इंग्रजीत मारगोसा ट्री(Margosa tree ) तर हिंदीत नीम असे म्हणतात. 25-30 फूट उंच असा हा सदाबहार वृक्ष आहे. हा वृक्ष पानांनी सदा गच्च भरलेला असल्यामुळे त्याची सावली आरामदायी असते . त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी तसेच घराच्या दारी हा वृक्ष मुद्दाम लावण्यात येतो.मार्च पासून मे पर्यंत पांढर्‍या रंगाची छोटी विशिष्ठ सुगंध असलेली फुले याला येतात. नंतर छोटी अंडाकृती फळे येतात . त्यांना लिंबोळ्या म्हणतात .कडुंनिंबाच्या संपूर्ण झाडाचा पंचांगांचा उपयोग होतो. 

रासायनिक गुणधर्म :

 कडुनिंबाच्या सालीत निम्बिन - निम्बोनीन नावाचे तेल असते .त्याचप्रमाणे tanin ,manosen, limonayad आदि रसायने प्राप्त होतात. वैज्ञानिक दृष्ट्या हे सिद्ध झाले आहे, की जवळजवळ  200  किटकांवर कडुंनिंबापासून बनविलेले  किटकनाशक  प्रभावी ठरते. याच्या बियांपासून पण तेल तयार होते. यात पामोटिक, अलिक, लिनोलिक इ. आम्ले असतात . याशिवाय गंधक, कॅल्शियम, पोटशियम व उच्च प्रतीचे एक स्वतंत्र अमायनोअसिड  प्राप्त होते . कडुनिंबाचा गोंद (डिंक ) चांगला मानला जातो . 

उपयोग :-

 1) निरोगी हवेसाठी - 

     घराच्या अंगणात कडुनिंबाचा वृक्ष असणे आरोग्यदायी असते. 

2)  इमारती व फर्निचरसाठी- 

    हा वृक्ष जुना जळ की याला एक प्रकारचा सुगंध येतो.कृमीघ्न या गुणामुळे हे लाकूड किडत नाही, म्हणून याचे     लाकूड उत्तम मानले जाते. 

3) दातांसाठी - 

   पूर्वीपासून कडुनिंबाची कोवळी दांडी दातून म्हणून दात घासण्यासाठी वापरण्याची पद्धत आहे . आजकाल       बाजारात याच्या पेस्ट व दंतमंजन पण मिळतात. घरगुती दंतमंजन करावयाचे असल्यास याच्या मुळांचे चूर्ण 50 ग्रॅम, सोना गेरू 10 ग्रॅम, सैंधव मीठ 10 ग्रॅम एकत्र करून निंबाच्या पानांचा रसात कालवावे व उन्हात पूर्णपणे सुकल्यावर बाटलीत भरून रोज दात घासण्यासाठी वापरावे. दातात रक्त येणे, तोंडाची दुर्गंधी, दाट दुखणे यावर हे प्रभावशाली मंजन आहे.

4) केसांसाठी- 

केसांमध्ये खवडे किंवा उवा झाल्यास , पानांना पाण्यात उकळून त्या पाण्याने डोके धुतल्यास फायदा होतो किंवा
पाने वाटून लावल्यास पण फायदा होतो. 

5) डोळ्यांसाठी- 

कडुनिंबाची पाने पाण्यात उकळून पाणी थंड करून त्यात कापूस भिजवून डोळ्यावर ठेवल्यास डोळ्यांची आग व खाज कमी होते.

6) तापावर- 

कडुंनिंबाची साल 5 ग्रॅम, लवंग / दालचिनी 500 मि.ग्रॅम यांचे चूर्ण ताप आल्यावर सकाळ-संध्याकाळ पाण्याबरोबर 2-2 ग्रॅम घ्यावे तसेचआंतरसालीचे चूर्ण किंवा ताजी पाने 50 ग्रॅम, 600 मि.ली. पपाण्यात 15 मि.उकळून 150 मि.ली. पाणी शिल्लक राहिल्यावर गाळून घ्यावे व हिवतापावर प्रत्येक तासाला 30 ते 60 मि.ली. घ्यावे. हा काढा रोज ताजा करावा.

7) त्वचारोगावर- 

खरूज, नायटे, गजकर्ण इ. त्वचारोगांवर पानांचा रस पोटात घ्यावा व पानांना वाटून त्याचा लेप लावावा.

8) काविळीवर- 

पानांचा रस 10 ग्रॅम, मध, सुंठ एकत्र करून घ्यावे.

9) उन्हाळ्याचा त्रास न होण्याकरता- 

होळींनंतर रोज सकाळी कडुनिंबाची पाने दांडया व जिरे पाण्यात वाटून ते पाणी गाळून, अर्धी वाटी रोज प्यावे उन्हाळा बाधत नाही.

10) सर्वं रोग प्रतिबंधक – 

कडुनिंबाची पाने, कापूर व हिंग एकत्र वाटून त्यात गुळ घालून छोट्या छोट्या गोळ्या करून ठेवाव्या व रोज रात्री 1 गोळी खावी. मनुष्य अत्यंत निरोगी राहतो.

11) गोवर व कांजण्यावर – 

गोवर व कांजण्या बर्‍या झाल्यावर आंघोळीच्या पाण्यात याची पाने उकळून,
त्या पाण्याने आंघोळ घालण्याची प्रथा भारतात रूढ आहे. त्यामुळे त्या रोगाच्या बाकी जंतूंचा नाश होतो. 

12) कीटकनाशक व साठवणीच्या वस्तूंसाठी-

 भारतातील या कल्पवृक्षावर  जगभरात अनेक संशोधन सुरू आहेत. पण भारतात याचे पाणी झाडांवर किटकनाशक फवारण्याची व सठवणीच्या धान्यात याची सुकलेली पाने टाकण्याची प्रथा पूर्वापारचालत आली आहे.

याशिवाय क्षयरोग, कॅन्सर सारख्या घातक रोगांवर यापासून औषधे तयार करण्याचे प्रयोग संशोधक करीत आहेत. 

Tuesday, December 13, 2016

तुळस एक औषधी वनस्पती

v     तुळस-

तुळशीचे वैज्ञानिक नाव ओसिमम सक्टम ( ocimum sactum) असे आहे. संस्कृत मध्ये हीला वृंदा, सुगंधा, अमृता इ. नावे असून, इंग्रजीत होली बेझील (Holy basil) तर हिंदीत तुलसी असे म्हणतात. तुळशीच्या अनेक जाती असून, त्यात
1)  श्वेत तुळस व 2) कृष्ण तुळस प्रमुख आहेत.
   तुळस ही झुडुपवजा वनस्पती असून, ती 2/4 फूट उंच वाढते. हीची पाने छोटी व सुगंधित वास असलेली असतात  झाड पूर्ण  वाढल्यावर मंजिर्‍यांमध्ये फुले बहरतात व त्यात गोलाकार, गुळगुळीत काळ्या रंगाची बी तयार होते.साधारणत:हिवाळ्यात बी तयार होते.
·       रासायनिक गुणधर्म:-
   तुळशीच्या पांनांपासून तेल तयार होते, जे वाळल्यावर स्फटिकासारखे बनते. त्याला तुळशी कापूर म्हणतात. तुळशीच्या पानांचा व बियांचा उपयोग करतात.
·       उपयोग :-
1)  ताप –
जीभ पांढरी होऊन, भूक न लागता ताप येतो, यावर तुळशीच्या पानांचा रस 10 ग्रॅम, कडुनिंबाचा रस 5 ग्रॅम व 1 ग्रॅम पिंपळी टाकून घ्यावा,
ताप उतरतो.
2) पोटदुखी –
21 तुळशीची पाने, 2 ग्रॅम सुंठ याचा पाण्यात काढा करावा व त्यात सैंधव मीठ व तुप घालून रोज ताजा सकाळ – संध्याकाळ 14 दिवस पिल्यास आराम पडतो.
3)  सर्दी खोकला –
तुळशीच्या रस 10 ग्रॅम, 2 ग्रॅम ज्येष्ठमधाची पावडर व 10 ग्रॅम साखर, 5-5 ग्रॅम दिवसातून 5 वेळा घ्यावे.
4)  त्वचारोग –
तुळशीची पाने व रस चोळल्याने खरूज, नायटे इ. रोग बरे होतात. तोंडावर
   किंवा हातापायांवर पांढरे चट्टे पडले असता तुळशीची पाने व थोडे मीठ           
  चोळल्याने फरक पडतो.
5) उन्हाळी-
तुळशीचे बी पाण्यात भिजवून त्यात जिरे व खडीसाखर खाल्ल्यास उन्हाळीचा त्रास कमी होतो.
6) कॅन्सर –
अलीकडेच कॅन्सरवर तुळस ही प्रभावशाली ठरू शकते, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
7)  डास –
दलदलीच्या जागी तुळशीची लागवड केली असता डासांची उत्पत्ती होत नाही.
     अशा तर्‍हेचे अनेक गुण तुळशीच्या झाडात असल्याने आपल्या पूर्वजांनी       
     दूरदृष्टीने घरोघरी
      तुळशीची झाडे असावी अशी योजना करून ठेवली आहे. मानवाच्या आरोग्य   व स्वास्थ्यासाठी
      ईश्वराने ही अत्यंत उपयुक्त वनौषधी निर्माण करून मानवाला बहुमोल देणगी दिली आहे.

      आपल्या घरी अंगणात किंवा कुंडीत तुळस अवश्य लावावी.

Sunday, December 11, 2016

मेहंदी एक सौंदर्य -वनस्पती

                मेहंदी


    मेहंदीची झुडपे भारतात सगळीकडे दिसतात. मेहंदीच्या पानांचा उपयोग रंगविण्यासाठी मुख्यत:केला जातो. शेत व घराच्या कुंपणासाठी पण या सदाहरीत झाडाचा उपयोग होतो. स्रियांच्या शृंगारात मेहंदीला प्राचीन काळापासून एक विशिष्ठ स्थान आहे. पानांना सुकवून त्याची वस्रगाळ पावडर बाजारात सर्वत्र मिळते. मेहंदीचे वैज्ञानिक नाव लॉंऊसोनिया एनर्मिस (Lowsoniya  Inermis ) आहे. संस्कृतमध्ये मेहंदीला रक्ता, रंजिका, नखरंजनी, मद्द्यान्न्तिका इ. नावे आहेत. इंग्रजीत हीना (Heena) तर हिंदीत मेहंदी म्हणतात. मेहंदी हे एक झुडुपवजा झाड आहे. याची पाने छोटी  व हिरवीगार असतात. फांद्यांच्या टोकावर पांढरी सुगंधित मंजिर्‍यामध्ये फुले येतात. त्यालाच नंतर छोटी–छोटी फळे गुच्छामध्ये येतात.

·       रासायनिक गुणधर्म :-

मेहंदीच्या पानांमध्ये taninwason नावाचे मुख्य रंजक द्रव्य असते. या व्यतिरिक्त galic asid इ. सारखी द्रव्ये  पण असतात व बियांपासून तेल पण प्राप्त होते.

·       उपयोग :-

1)  डोकेदुखी व पित्त –

 गरमी किंवा पित्ताने डोके दुखत असल्यास 25 ग्रॅम मेहंदीची पाने 50 ग्रॅम तिळाच्या तेलात उकळून हे तेल डोक्याला लावावे किंवा 10 ग्रॅम मेहंदीची फुले 100 ग्रॅम पाण्यात उकळून ते पाणी पिण्याने लाभ होतो.

2)  तोंड आल्यावर
 10 ग्रॅम मेहंदीची पाने , 200 ग्रॅम पाण्यात उकळून त्या पाण्याने     गुळण्या कराव्या.

3)  केस रंगविण्यासाठी –

  मेहंदीची पावडर, लिंबाचा रस, आवळा पूड, चहाचे पाणी हे सर्व रात्रभर लोखंडी भांड्यात भिजवून, सकाळी केसांना लावावे व 2 - 3 तासांनंतर कोमट पाण्याने धुवावे. केस नैसर्गिकरित्या रंगतात सतेज व मुलायम होतात.

4) अत्तरासाठी

  मेहंदीच्या फुलापासून अत्तर तयार होते.याला हीना असे म्हणतात.

5)  घश्याला सूज व तोंड आल्यास

  मेहंदीच्या पानांच्या काढयाने गुळण्या कराव्या.

6)  आवेवर

मेहंदीच्या बिया पाण्यात उकळून ते पाणी पिण्यास द्यावे.

7)  हात व पाय सजविण्यासाठी-

 पूर्वी काही विशिष्ठ समाजात किंवा
प्रांतात उदा. राजस्थान, गुजराथ इ. लग्नसमारंभात किंवा धार्मिक कार्यात स्रियांनी, विशेषत: नववधुनी मेहंदीने हात सजविण्याची रीत होती. पण आजकाल मात्र संपूर्ण भारतभर शुभकार्यात मेहंदी काढण्याची प्रथा फार प्रचलित झाली असून,
मेहंदीचा कार्यक्रम हा एक वेगळा कार्यक्रम प्रत्येक लग्नकार्यात
अगदी आवर्जून असतो. अत्यंत कलाकुसरीने सुंदर नक्षीदार नक्षीने नववधू व इतरांचे हात व पाय रंगलेले दिसतात.

8) व्यवसाय-

मेहंदी कढण्याला अतिशय महत्व आल्याने आजकाल ही कला व्यवसाय म्हणून प्रसिद्ध आहे. विशेषत: स्रियांसाठी हा एक सोयिस्कर व घरबसल्या करण्याचा उद्योग ठरला आहे.
द्रव्यगुण विज्ञान, सुश्रुत आदि ग्रंथांमध्ये मदयंती,रक्ता म्हणून
मेहंदीचा उल्लेख आढळतो.





Thursday, December 8, 2016

आवळा एक दिव्य औषधी वनस्पती

  

                               आवळा         

           आवळ्याचा वृक्ष संपूर्ण भारतभर जंगलामध्ये,बागांमध्ये आढळतो .  आवळा  हे अत्यंत लोकप्रिय  फळ आहे.

  •  आवळ्याचे 2 प्रकार आहेत.

 1)   जंगली व 2) बागेतील

 समुद्र सपाटीपासून 4500 फूट उंचीवर पण हे वृक्ष आढळतात
बागेतील फळे ही जंगलातील फळांपेक्षा आकाराने मोठी,रसाळ व
चविष्ट असतात. जंगलातील फळे लहान व जास्त तुरट असतात.
आवळ्याला त्यातील औषधी द्रव्यामुळे सर्वंश्रेष्ठ फळ मानले जाते.
आवळ्याचे वैज्ञानिक नाव इमब्लीका ऑफिसिजीटीस गायरटन (Emblika offininitis gaertn) असे असूनसंस्कृतमध्ये आवळ्याला आमलकीधात्रीशिवा इ.नावे आहेत. इंग्रजीत इंडियन गुजबेरी (indian gooseberry) तर हिंदीत आमला,आंवला असे म्हणतात. आवळ्याचे झाड मध्यम आकाराचे 20 ते 25 फूट उंच असते.पाने चिंचेच्या पानांसारखी बारीक व पक्षाच्या लांब पंखासारखी असतात. फुले पिवळट-पांढरी, गुच्छामध्ये येतात. फळ हिरव्या रंगाचे असून, त्यावर 6 रेषा असतात व आत षटकोषीय बीज असते. फेब्रुवारी ते मे मध्ये त्याला फुले येतात व ऑक्टोबर ते एप्रिलपर्यंत फळे मिळतात.

  • गुणधर्म- 

आवळ्याच्या फक्त फळाचा उपयोग होतो. फळाला अमृता असे पण म्हणतात. हे फळ म्हातारपण येऊ देत नाही असे म्हटले जाते. आंबट, गोड, तुरट, थंड, केश्य, सारक, पौष्टिक व डोळ्यांना हितकर अशा आवळ्यामध्ये व्हिटामिन सी-क जीवनसत्त्व प्रचूर मात्रेत उपलब्ध आहे.याशिवाय galic acid, tanic acid, साखर, अल्बुमिन, सेल्युलोज कॅल्शियम देखील मिळते. फळाच्या 100 ग्रॅम गरामध्ये मिळणारे घटक पुढीलप्रमाणे –
1) पाणी-81.2 मि.ग्रॅ.
2) प्रोटीन-0.5 मि.ग्रॅ.
3) फट्स (fats)-0.1 मि.ग्रॅ.
4) फॉस्फरस-0.02 मि.ग्रॅ.
5) कॅल्शियम-0.05 मि.ग्रॅ.
6) लोह-1.2 मि.ग्रॅ.
7) निकोटेनिक असिड-0.2 मि.ग्रॅ. मिळते.
याशिवाय फळांमध्ये 28 %,
शाखांमध्ये 21%,
खोडाच्या सालीत 8.5% व
पानांमध्ये 22% tanin असते व
बियांपासून तेल पण मिळते.

vउपयोग:-

1) पचनासाठी- ताजा पिकलेला आवळा भूक वाढविणारा,
पाचक,रुचकर,पित्तनाशक व पौष्टिक असतो.
2) क-जीवनसत्त्व- चार संत्र्याएवढे क जीवनसत्व 2 आवळ्यामध्ये असते. त्यामुळे रोज 2 ताजे आवळे खाल्ल्यास शरीरातील सर्व व्यवहार सुरळीत राहतात व प्रकृती उत्तम राहते.
3) पित्तनाशक – मोठ्या आवळ्यांपासून तयार केलेला मोरावळा रोज सकाळी 1 चमचा सेवन केल्याने पित्ताचा त्रास होत नाही.
4) सतेज कांतीसाठी- वस्रगाळ आवळकंठी (पावडर) पाण्यात भिजवून अंगास लावावी. आवळ्यामध्ये तुरट, गोड, आंबट, खारट, कडू हे पाच रस असल्याने तो खाल्ल्याने कांती सतेज व निरोगी राहते.
5) शक्तिवर्धक – आवळ्यांपासून तयार होत असलेले च्यवनप्राश हे शक्तिवर्धक आहे असे म्हणतात, प्राचीन काळी देवांचे वैद्य अश्विनीकुमार यांनी त्याचे औषध तयार करून च्यवन ऋषिना तारुण्य प्राप्त करून दिले.च्यवन ऋषींवरुन हे नाव पडले.
6) केसांसाठी- आवळा केसांसाठी पण अत्यंत उपयुक्त आहे. केस गळत असल्यास आवळ्याचा रस, जेष्ठमध, चंदन, पिंपळी, व निळे कमळ यांचा कल्प तिळाच्या तेलात घालून तयार केलेले तेल रोज वापरल्यास फायदा होतो.
ब्राम्ही व आवळा मिळून तयार केलेले ब्राम्ही–आवळा तेल पण फार गुणकारी असते. ते बाजारात ब्राम्ही आवळा केशतेल या नावाने मिळते. आवळा, रिठा, शिकेकाई व इतर वनौषधी घालून तयार केलेली शिकेकाई पावडर वर्षभरासाठी तयार करून गरजेप्रमाणे 1-2 चमचे ती पावडर पाण्यात उकळ्वून त्या पाण्याने केस धुतल्याने केसांना एक प्रकारची चकाकी येते.केस गळायचे थांबतात. आवळ्याचे असे अनेक उपयोग असून अश्या या बहुगुणी व बहू उपयोगी वृक्षाची लागवड आजकाल व्यापारीदृष्ट्या पण  मोठ्या प्रमाणात व्हायला हवी. आवळ्याचा वुक्षाला आध्यात्मिक देखील महत्व आहे. असे म्हणतात भगवान विष्णुला आवळ्याचा वृक्ष अत्यंत प्रिय आहे.

 चला तर मग एक तरी आवळ्याचा वृक्ष प्रत्येकाच्या अंगणात लावू या!
 त्याची मनोभावे पूजा ही करू या, अन अमृतरूपि आवळे ही चाखू या!